अलर्ट मिळाला अन् मुनीरचा फोन अमेरिकेत खणखणला; भारत-पाक युद्धविरामाची नवी स्टोरी समोर

India Pakistan War : पहलगाम येथील दहशतवादी हल्ला. त्यानंतर भारतीय सैन्याचं (Indian Army) थेट पाकिस्तानात ऑपरेशन सिंदूर. बिथरलेल्या (Operation Sindoor) पाकिस्तानचा भारतीय शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न. भारताचंही पाकिस्तानला सडेतोड उत्तर. युद्ध पेटलं असं वाटत असतानाच अचानक झाला (India Pakistan Ceasefire) युद्धविराम. आता हे कोडं सर्वसामान्यांनाच नाही तर थेट लष्करातील माजी अधिकाऱ्यांनाही पडलंय. याचं उत्तर जो तो आपापल्या पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न करतोय. यातच आता या युद्धविरामा मागची आणखी एक स्टोरी समोर आलीय. काय आहे ही स्टोरी जाणून घेऊ यात..
10 मे रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानवर प्रत्युत्तराची कारवाई सुरू केली. त्यांच्या काही एअरबेसवर हल्ले केले. यानंतर पाकिस्तानच्या डिफेन्स नेटवर्कमध्ये एक अलर्ट दिसला. हा अलर्ट असा होता की पाकिस्तानी सैन्याचा प्रमुख असीम मुनीरला थेट अमेरिकेला फोन करण्याची गरज जाणवली. दोन्ही देशांतील युद्धविरामाची माहिती सर्वात आधी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन दिली होती. मात्र, याआधी पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या होत्या.
यात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि असीम मुनीर यांच्यातील चर्चा महत्वाची ठरली. इंडियन एक्सप्रेसशी संबंधित शुभाजित रॉय म्हणतात, हा फोन कॉल युद्धविरामाच्या दिशेने पहिला संकेत होता. मुनीरशी बोलण्याआधी रुबियो यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशीही चर्चा केली होती. नंतर त्यांना मुनीरशीही चर्चा करावी लागली.
रुबियो यांनी मुनीरला सांगितले की आम्ही दोन्ही देशांत युद्धविराम करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. पहिल्यांदाच अमेरिका सरकार आणि पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांत चर्चा झाली होती. याआधी 1 मे रोजी मार्को रुबियो आणि भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यात चर्चा झाली होती. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. थेट पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केले. या घडामोडींची माहिती एनएसए अजित डोभाल यांनी मार्को रुबियो यांना दिली होती.
नंतर 8 मे रोजी पुन्हा जयशंकर आणि रुबियो यांच्यात चर्चा झाली. दोन्ही देशांतील तणाव तत्काळ कमी करण्याची गरज आहे असे रुबियो यांनी सांगितले. दोन्ही देशांत थेट चर्चा व्हावी यावर त्यांनी जोर दिला. जर दोन्ही देश आपसात चर्चा करतील तर यास अमेरिका समर्थन देईल असेही रुबियो यांनी स्पष्ट केले होते. परंतु, आमची कारवाई दहशतवादाविरुद्ध होती पाकिस्तान विरुद्ध नव्हती असे भारताने स्पष्ट केले होते.
एनडीटीव्हीशी संबंधित शिव अरुर सरकारी सूत्रांच्या हवाल्याने लिहीतात की 10 मे रोजी सकाळी पाकिस्तानने श्रीनगरवर हल्ला केला. यानंतर भारतीये वायू दलाने पाकिस्तानी वायू दलाचे महत्वाच्या ठिकाणांवर मिसाइल डागले. काही एअरबेसवर थेट ब्रह्मोस मिसाइल सोडण्यात आल्या. रफिक, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सुक्कुर आणि चुनियन सैन्य ठिकाणांवर हल्ले झाले.
ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही, पाकिस्तानला नक्कीच धडकी भरणार…
या हल्ल्यानंतर लगेचच भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या लक्षात आले की पाकिस्तानी एअर डिफेन्स नेटवर्कवर एक हाय अलर्ट मेसेज फ्लॅश झाला आहे. भारताचं पुढील टार्गेट पाकिस्तानचे अण्वस्त्र कमांड आणि नियंत्रण यंत्रणा असू शकतात असा तो अलर्ट मेसेज होता. यानंतर येथील सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्यात आली. याच वेळी पाकिस्तानने अमेरिकेला विनंती करत यात तत्काळ हस्तक्षेपाची मागणी केली. यानंतर अमेरिकेलाही हस्तक्षेप करण्याची गरज जाणवली. यानंतर पुढे युद्धविरामाच्या हालचाली जोरात सुरू झाल्या.