पुन्हा तीच इच्छा …तोच गोंधळ…. शरद पवारांच्या सेनापतीबाबतही ‘ते’च घडेल?

Jayant Patil’s resignation statement was made to appease the opposition within the party: जयंत पाटील(Jayant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदावरून बाजूला होण्याची इच्छा जाहीर केल्यानंतर चर्चांना उधाण आलंय. यावेळी आठवला तो दिवस, अर्थात 2 मे 2023. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचं वक्तव्य करत सगळ्यांनाच धक्का दिला होता. धक्कातंत्राचा वापर करणं ही शरद पवार(Sharad Pawar) यांची जुनी स्टाईल. त्यावेळी कार्यकर्त्यांनी गोंधळ केला होता. आज ही पुन्हा तीच इच्छा… तोच गोंधळ…. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पाहायला मिळाला. मात्र, यावेळी केंद्रस्थानी होते शरद पवारांचे सेनापती अर्थातच जयंत पाटील. जयंत पाटील यांचं राजीनाम्याचं सुतोवाच पक्षांतर्गत विरोधकांना गारद करण्याचा डाव असल्याचं बोललं जात आहे.
सुप्रिया सुळेंचं स्टेटस…राष्ट्रवादी एकत्र येणार? अजितदादांच्या पठ्ठ्याने केला मोठा खुलासा
जयंत पाटलांनी राजीनामा दिला नसून देण्याची फक्त इच्छा व्यक्त करतानाच अंतिम निर्णय हा शरद पवारांचाच असल्याचं म्हणत पवारांच्या कोर्टात चेंडू टाकला आहे. त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य संभ्रम तयार करणारं ठरलं आहे. पण राजकारण कोळून प्यायलेल्या शरद पवार यांनीच तर जयंत पाटलांना पक्षातून होणारा विरोध थोपवण्यासाठी आणि पक्षातील त्यांचं स्थान अजून बळकट करण्यासाठी हा डाव टाकला असेल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. असं म्हणायला वाव मिळतो तो शरद पवारांच्या स्वत:च्या राजीनामा नाट्याच्या आधारावर. मी मारल्या सारखं करतो…तु रडल्या सारखं कर… या उक्तीनुसार हा शरद पवारांचाच राजकीय डाव असल्याचं म्हणता येईल.
‘राजकारणाचा काही अंदाज नाही, तुम्ही आशावादी राहा’; खा. लंकेंनी नेमकं काय सांगितलं ?
जयंत पाटलांवरील शरद पवारांचा दृढ विश्वास महाराष्ट्रानं वेळोवेळी पाहिला आहे. जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी 2018 पासून देण्यात आली आहे. जवळपास सात वर्ष ते प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. मात्र तेव्हाची ठळक आणि खास बाब म्हणजे शरद पवारांनी आपल्या पुतण्याची अर्थात अजित पवारांची इच्छा असतानाही त्यांना डावलून जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. पवारांच्या पडत्या काळात म्हणजेच जेव्हा पक्ष फुटला… तेव्हा पुतण्यासह पक्षातील सर्वच मातब्बर नेते सोडून गेले पण त्यानंतरही जयंत पाटलांनी शरद पवारांसोबतच राहणे पसंत केले. त्यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूकांतही पक्षाला मोठं यश मिळालं. तेव्हा जयंत पाटलांच्या राजीनाम्यामागे कारण ते काय असू शकतं? तेव्हा जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातील अंतर्गत कुरघोडीचं राजकारण हेच एकमेव कारण यामागे असू शकतं, असं बोललं जात आहे. विधानसभेतला पराभव यासाठी निमित्त ठरला होता. केवळ प्रदेशाध्यक्षच नव्हे तर सर्वच प्रमुख पदांवर बदल व्हावेत आणि सोबतच रोहित पवार आणि रोहित पाटलांना मोठी जबाबदारी देण्याची मागणी त्यावेळी लावून धरण्यात आली होती. रोहित पवार पद नसल्यानं नाराज असल्याचंही बोललं जात होतं. त्यामुळे हे प्रकरण थांबवण्यासाठी शरद पवारांनी जयंत पाटलांना हा डाव शिकवल्याची कुजबुज सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. सध्या तरी जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावर कायम करणे आणि रोहित पवारांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जबाबदारी देत वाद मिटवण्याची ही चाल शरद पवार कदाचित खेळत असावेत, असं म्हणता येईल.
जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यानंतर बोलताना शरद पवारांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर यावर विचार केला जाईल आणि तोपर्यंत जयंत पाटलांना थांबायला सांगितल्याचं म्हटलं आहे. असंच काही घडलं होतं खुद्द शरद पवारांच्या बाबतीतही. पवारांनी राजीनामा दिला आणि नंतर तो तुर्तास स्थगित करत सर्वांशी बोलून निर्णय घेण्याचं सांगितलं होतं. मात्र त्यानंतर पवार अध्यक्ष म्हणून आजही कायम आहेत. तोच प्रकार जयंत पाटलांसोबत घडत असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळेच, सगळेच म्हणत असावेत… पुन्हा तीच इच्छा …पुन्हा तोच गोंधळ… पुन्हा तोच निर्णय…