“मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा”, जयंतरावांच्या विनंतीवर पवारांचं सोपं उत्तर, म्हणाले, आता..

Sharad Pawar on Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन (Sharad Pawar NCP) सोहळा आज पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या सुरुवातीलाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा. नव्या चेहऱ्यांना संधी द्या, अशी विनंती व्यासपीठावरुन केली. त्यांच्या या विनंतीनंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यांच्या या विनंतीवर शरद पवार यांनी आपल्या भाषणात उत्तर दिलं. प्रमुख सहकाऱ्यांना एकत्र घेऊ, संवाद करू. सामूहिकपणे निर्णय़ घेऊ असं सोपं उत्तर शरद पवार यांनी देत वेळ मारून नेली.
काय म्हणाले होते जयंत पाटील?
‘मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी (Sharad Pawar) यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे. पक्ष २७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. देशपातळीवर या पक्षानं मोठ योगदान दिल्याचे जयंत पाटील म्हणाले. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून देश संकटात तेव्हा एक व्हायच असत अस पवारांनी सांगितले असे म्हणत जयंत पाटलांनी ऑपरेशन सिंधूरबाबत जगभरात पाठवलेल्या शिष्टमंडळवर भाष्य केले. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ गेलं त्यांनी भारताची बाजू भक्कमपणे मांडल्याचेही जयंत पाटील म्हणाले.
साहेबांनी एका मोठ्या हस्तीला दम दिला होता; जोरदार भाषण करत लंकेंनी बालगंधर्व रंगमंदीर गाजवलं
शरद पवारांनी काय सांगितलं
पक्ष संघटनेचं काम जयंतरावांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. त्यांच्या मागे आपण सगळेच उभे आहोत. जयंत पाटलांनी जी विनंती केली आहे त्याबाबत प्रमुख सहकाऱ्यांना एकत्र घेऊ. त्यांच्याशी संवाद करू आणि पुढे याबाबतीत सामूहिकपणे निर्णय घेऊ. याचबरोबर तालुका आणि जिल्हा पातळीवरही पक्षात नवे चेहरे दिसायला हवेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत तेव्हा नव्या चेहऱ्यांना संधी देऊ या अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.
दोन ते तीन महिन्यात निवडणुका येतील. त्यात जिल्ह्यातील नेतृत्वाला विश्वासात घेऊन निवडणुका कशा लढायच्या याचा विचार आता आपल्याला करायचा आहे. आणखी एक काम आपल्या सगळ्यांनाच करायचं आहे. पुढील तीन महिने तुमचं सगळं लक्ष निवडणुकीत नवीन नेतृत्व कसं आणायचं. याचा विचार करा. राज्याचं नेतृत्व तुमची नक्कीच मदत करील, असे आश्वासन शरद पवार यांनी मेळाव्याला उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले.
ब्रेकिंग : मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा; दमदार भाषण केल्यानंतर जयंतरावांचे राजीनाम्याचे संकेत