‘देवेंद्र’ आले मदतीला धावून! फडणवीसांना फक्त एक मेसेज, काठमांडूमधून ५८ भाविकांची सुटका!

  • Written By: Published:
‘देवेंद्र’ आले मदतीला धावून! फडणवीसांना फक्त एक मेसेज, काठमांडूमधून ५८ भाविकांची सुटका!

पुणे : 6 लाख रुपये दिल्याशिवाय सोडत नाही, असं म्हणत नेपाळमधील काठमांडू (Kathmandu) येथे पर्यटनासाठी गेलेल्या रायगड जिल्ह्यातील 58 जणांना डांबन ठेवण्यात आले होते. या पर्यटकांनी अनेक नेत्यांना फोन, मेसेज केले. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फक्त एक मेसेज आला आणि सर्व यंत्रणा हलली. नेपाळपासून ते उत्तर प्रदेशापर्यंत अक्षरश: व्हीआयपी ट्रिटमेंट मिळून हे भाविक रायगड जिल्ह्यातील आपल्या गावी पोहोचले. काठमांडूमध्ये देवेंद्रच आमच्या मदतीला धावून आले, अशी कृतज्ञ भावना या पर्यंटकांनी व्यक्त केली.

Loksabha Election 2024 : लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसच राज्यात महायुतीचा चेहरा? 

यातील एक भाविक संजू म्हात्रे यांनी सांगितले की आम्ही रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कामोठे गावातील ५८ भाविक नेपाळमध्ये धार्मिक पर्यटनासाठी गेले होते. ३५ महिला आणि २३ पुरुष त्यामध्ये होते. गोरखपूरहून नेपाळपर्यंत सगळे व्यवस्थित पोहोचले. लुंबीनी, पोखरा, जनकपुरी, मनोकामना या ठिकाणी दर्शन घेतले. मात्र, काठमांडूला आल्यावर त्यांना राधाकृष्ण ट्रॅव्हल्सच्या एका बसमध्ये कोंबण्यात आले. भाविकांनी गावाहून निघतानाच सर्व पैसे भरलेले होते. मात्र, त्यांची फसवणूक झाली होती. तुमच्या पर्यटन कंपनीकडून पैसे आले नाहीत. सहा लाख रुपये दिले नाहीत तर सोडणार नाही असे या ट्रॅव्हल्सचा मालक अंकीत जायस्वाल आणि त्याच्या साथीदारांनी धमकावयला सुरूवात केली.

केंद्र अन् ट्रिपल इंजिनने शेतकऱ्यांचं कंबरड मोडलयं; सुळेंनी दोन्ही सरकारला धरलं जबाबदार 

म्हात्रे यांनी सांगितलं की, परक्या गावात उद‌्भवलेल्या या प्रसंगामुळे काय करायचे हा प्रश्न आमच्यासमोर होता. आम्ही ओळखीच्या लोकांमार्फत नेत्यांना आणि त्यांच्या पीएंना फोन करायला सुरुवात केली. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळेना. शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करून आपल्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. त्यांचा तातडीने प्रतिसाद आला, लगेचच फडणवीस यांचे खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील स्वीय सहायक मनोज मुंडे यांनी या भाविकांशी संपर्क साधला,असं म्हात्रे यांनी सांगिलतं.

दरम्यान, फडणवीस यांच्या टीमने मूळचे नेपाळचे असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे माजी स्वीय सहायक संदीप राणा यांना कळविले. राणा यांनी स्वत: या भाविकांची भेट घेतली व सर्व भाविकांची व्यवस्था करून विशेष बसने त्यांना गोरखपूरला पोहोचविले. देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे भाविक गोरखपूरला पोहोचल्यावर तेथील जिल्हाधिकारी स्वत: भेटीला आले. त्यांनी दोन दिवस भाविकांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली. त्यांना मुंबईपर्यंत कसे न्यायचे प्रश्न होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून गोरखपूरपासून मुंबईपर्यंत खास बोगी जोडण्याची विनंती केली. रेल्वेने त्याप्रमाणे भाविकांसाठी गोरखपूरहून मुंबईपर्यंत रेल्वेची एक बोगी आरक्षित करू दिली. दोन दिवस प्रवास करून सर्व जण सुखरुपपणे मुंबईला पोहोचले.

अत्यंत कठीण परिस्थितीत फडणवीस यांनी केलेल्या मदतीमुळे भाविक भारावून गेले होते. अनेक नेत्यांशी संपर्क साधला. परंतु, कोणीही मदत केली नाही. पण एका मेसेजवर देवेंद्र फडणवीस आमच्या मदतीला धावून आले. नेपाळपासून ते उत्तरप्रदेशपर्यंत आपल्या संपर्काचा वापर करून आम्हाला सुखरुपपणे घरी पोहोचविले अशी कृतज्ञ भावना भाविकांनी व्यक्त केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube