Ground Zero : सुहास कांदेंचा डाव, निवडणुकीपूर्वीच ‘भुजबळ’ क्लिन बोल्ड!

Ground Zero : सुहास कांदेंचा डाव, निवडणुकीपूर्वीच ‘भुजबळ’ क्लिन बोल्ड!

छगन भुजबळ (Chaggan Bhujbal) यांना पाच वर्षांपासून कोणती व्यक्ती जास्त डसत असावी? याचं उत्तर आहे, सुहास द्वारकानाथ कांदे (Suhas Kande). कांदेंनी आधी नांदगावमध्ये पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) यांची आमदारकी हिसकावली. मग नाशिकमध्ये (Nashik) डीपीडीसी बैठकीत निधीवरुन भुजबळ यांना भिडले. ऐन लोकसभेत भुजबळ तुतारीचे काम करत आहेत, असा आरोप करत माध्यमांना पुरावेच दिले. त्यावेळी भुजबळांना स्पष्टीकरण देऊन देऊन नाकीनऊ आले होते.

आता भुजबळ पुन्हा नांदगावमध्ये मुलासाठी फिल्डिंग लावत होते. पण कांदे यांनी लोकसभेला भाजपच्या उमेदवार भारती पवार यांना 41 हजारांचे लीड देत आपले स्थान भक्कम केले आहे. त्यामुळे आधी लोकसभेला, मग राज्यसभेला आणि आता विधानसभेलाही भुजबळ यांच्या हाती फारसे काही लागणार नाहीये. त्यामुळे कांदे पुन्हा एकदा भुजबळ यांच्यावर वरचढ ठरताना दिसत आहेत. (In Nandgaon Assembly Constituency, there may be a fight between Suhas Kande of Shiv Sena and Ganesh Dhatrak of Shiv Sena (UBT).)

नेमकं काय घडतंय नांदगाव विधानसभा मतदारसंघात? पाहुया लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरोमधून…

नांदगाव मतदारसंघात स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचेच वर्चस्व होते. पण 1990 मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या कॉम्रेड माधवराव गायकवाड यांनी मतदारसंघात लाल निशाण फडकवले. 1995 मध्ये भाजप-शिवसेना लाटेत नांदगावकरांनी शिवसेनेच्या झोळीत भरभरून मतांचे दान टाकले. राजेंद्र देशमुख या मतदारसंघातील शिवसेनेचे पहिले आमदार झाले. 1999 मध्ये काँग्रेसच्या अनिल आहेर यांनी शिवसेनेच्या ताब्यातून हा मतदार संघ आपल्याकडे खेचून आणला. 2004 मध्ये संजय पवार यांनी पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवला. इथे पर्यंत काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना होता. 2009 मध्ये मात्र राजकीय बदलाचे वारे जोरदार वाहू लागले होते. भुजबळांनी आघाडीत नांदगाव मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी खेचून आणला. तिथून पंकज भुजबळ यांना रिंगणात उतरवले.

काही जुन्या पत्रकारांच्या मते, भुजबळ यांनी हा डाव दादा भुसे यांच्याशी झालेल्या एका छुप्या करारानंतर खेळला होता. मालेगाव तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट नांदगाव मतदारसंघाला जोडले गेले होते. इथे शिवसेनेचे दादा भुसे विरुद्ध राष्ट्रवादीचे प्रशांत हिरे अशी लढत होती. राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत स्पर्धेत हिरे हे भुजबळ यांना डोईजड ठरत होते. 2004 मध्ये भुजबळ यांच्याच मदतीने दादा भुसे यांनी हिरे यांचा पराभव केला होता. 2009 मध्ये पुन्हा हिरे यांचा पराभव करायचा आणि ही स्पर्धाच संपवायची असा निश्चय भुजबळांनी केला. त्यासाठी त्यांनी भुसे यांना छुपी ताकद द्यायचे ठरले. त्या बदल्यात भुसे यांनी पंकज भुजबळ यांना मालेगावमधील तीन जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये मदत करायची, असा तो दोघांमधील छुपा करार होता.

Ground Zero : भाजप सुरेश भोळेंना रिप्लेस करणार? तीन ‘मराठा’ चेहरे चर्चेत

2009 च्या निवडणुकीत पंकज भुजबळ नांदगावमधून आमदार झाले. शेजारच्या येवला मतदारसंघातून स्वत: छगन भुजबळ आमदार झाले, राज्यात मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री झाले. इकडे नाशिकमध्ये पुतण्या समीर भुजबळ खासदार झाले होते. एकूणच नाशिकची सगळी सत्ताकेंद्र भुजबळ यांच्चया घरात होती. 2014 साली मोदी लाटेने राजकारण फिरवलं. नाशिकमध्ये समीर यांचा पराभव झाला. पंकज भुजबळ यांच्याही आमदारकीवर तेव्हाच घाव बसला असता. शिवसेनेनेही पुन्हा एकदा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले. पण शिवसेना आणि भाजपमधील मतविभागणीचा फायदा पंकज यांना झाला. त्यांनी सलग दुसऱ्यांदा आमदारकीचा मान मिळविला. त्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना 50-50 हजार मते मिळाली होती. तर पंकज भुजबळ यांना 69 हजार मते पडली होती.

2016 मध्ये छगन भुजबळ यांच्या राजकीय वर्चस्वाला सगळ्यात मोठा धक्का बसला. भ्रष्टाचाराच्या आरोपात ते तब्बल दीड वर्ष तुरुंगात गेले. इकडे वडील तुरुंगात गेल्याचे बघून सुहास कांदे यांनी पंकज भुजबळ यांना खिंडीत गाठलं. अचानकपणे सगळीच जबाबदारी पंकज यांच्यावर येऊन पडली होती. येवला आणि नांदगावमध्ये धावपळ होऊ लागली. राजकारण आणि इतर गोष्टींमध्ये दमछाक होत होती. त्याचवेळी सुहास कांदे यांनी नांदगाव मतदारसंघात राष्ट्रवादी पोखरायला सुरुवात केली. भुजबळ यांच्याभोवतीच्या अनेक दिग्गजांना शिवसेनेत घेतले. मनमाड आणि नांदगावच्या नगरपालिकेवर भागवा फडकवला. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही शिवसेनेने बाजी मारली. नांदगावमध्ये कांदे यांनी अडीच वर्षांच्या काळात पुन्हा एकदा शिवसेनेचे वर्चस्व निर्माण केले.

हे धक्के पचवत असतानाच कांदे यांनी भुजबळ यांच्या घरातून एक आमदारकीही मायनस केली. 2019 मध्ये पंकज यांच्या विरोधात शिवसेनेने सुहास कांदे यांनाच दुसऱ्यांदा उमेदवारी दिली. समीकरणे परफेक्ट बसली आणि तब्बल 13 हजारांच्या मताधिक्याने कांदेंनी पंकज यांचा पराभव केला. लोकसभेलाही समीर यांचा दुसऱ्यांदा पराभव झाला. पाठोपाठ मुलाचा पराभव झाला. छगन भुजबळ यांच्यासाठी हे दु:ख न पचणारचं होतं. या दु:खातून सावरण्यासाठी त्यांना मदत झाली महाविकास आघाडी सरकारची. भुजबळ मंत्री आणि पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्री झाले. पण कांदे शांत बसले नव्हते. महाविकास आघाडी सरकारमध्ये असूनही नाशिकच्या डीपीडीसी बैठकीत ते भुजबळांना नडत होते. निधीच्या मुद्द्यावरून घेरत होते. दोघांचा वाद संपूर्ण राज्यात गाजला होता. महायुतीचे सरकार येताच कांदे यांनी भुजबळांनी मंजूर केलेल्या निधीला आणि कामांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्टे आणला. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला होता.

Ground Zero : बांगरांच्या आमदारकीवर नांगर फिरणार? ठाकरेंकडे चार तगडे पर्याय

यंदा छगन भुजबळ नाशिक लोकसभेसाठी इच्छुक होते. आपल्याला किंवा आपल्या घरात तिकीट द्यावे अशी त्यांची इच्छा होती. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हेमंत गोडसे यांनी त्यांचे हे राजकीय इप्सित साध्य होऊ दिले नाही. त्यानंतर भुजबळांनी राज्यसभेसाठी तयारी सुरु केली. पण अजितदादांनी तिथे सुनेत्रा पवारांना खासदार केले. त्यामुळे आता पंकज यांना तरी नांदगावमधून उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी अजितदादांकडे केली. लोकसभेवेळीच पंकज यांनी त्यांचे नेटवर्क अॅक्टिव्ह केले होते. पण त्यांनी विधानसभेच्या दृष्टीने काम सुरु केले आहे. ज्याचा आमदार त्याची जागा असा फॉर्मुला ठरला असतानाही मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घ्यायचा अशी भुजबळ यांची योजना आहे. यातून कांदे यांनाही धडा शिकवायचा आणि पंकज यांचेही राजकारण सेट करुन द्यायचे असा दुहेरी हेतू त्यांनी ठेवला आहे.

पण लोकसभा निवडणुकीत नांदगाव मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवार भारती पवार यांना 41 हजारांचे लीड मिळाले आहे. या लीडमागे सर्वात मोठा वाटा कांदे यांचाच होता, हे स्वतः भारती पवारही मान्य करतील. यातून सुहास कांदे यांचा मोठा प्रभाव आणि वरचष्मा असल्याचे दिसून येते. त्यामुळेच कांदे यांनी एक प्रकारे उमेदवारीही फिक्स केल्याचे बोलले जाते. कांदेंनी विधानसभेच्या दृष्टीने विरोधातील पाच पैकी संजय पवार आणि राजेंद्र देशमुख या दोन माजी आमदारांनाही बरोबर घेतले आहे. या दुष्काळी मतदारसंघात पाण्याचा प्रश्न गंभीर असतो. मनमाड शहरात तर तो तीव्र आहे. पण धरणातून थेट जलवाहिनीद्वारे योजना राबवून कांदे यांनी मनमाडचा यक्ष पाणी प्रश्न सोडवून दाखवला आहे. ही त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे आज घडीला तरी पंकज भुजबळ त्यांच्याविषयी ती अनुकूलता दिसत नाही. अप्रत्यक्षरीत्या आमदार कांदेंनी मंत्री भुजबळ यांची राजकीय कोंडीच केली आहे.

नांदगावमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे माजी आमदार अनिल आहेर पुन्हा इच्छुक आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नांदगाव, मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख गणेश धात्रक इच्छुक आहेत. ठाकरे गटाकडे मनमाड शहरातील माजी नगरसेवकांचे, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे जाळे आहे. लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांना इथे 61 हजार मते मिळाली आहेत. ही ठाकरे गटासाठी आश्वासक आहेत. यात मनमाड शहरात भगरे यांना चांगले मतदान झाले आहे. पण मालेगाव तालुक्यात तीन जिल्हा परिषद गटांमध्ये भारती पवार यांना लक्षणीय मतदान झाले आहे. ठाकरे गटाला इथे आणखी काम करण्याची गरज आहे. अन्यथा सुहास कांदे यांची आमदारकी फिक्स आहे असेच म्हणावे लागले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube