जनतेसमोर स्पष्ट जाहीरनामा मांडूनच भाजप निवडणूक लढवत असल्याचं प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याकडून स्पष्ट
जनतेसमोर स्पष्ट जाहीरनामा मांडूनच भाजप निवडणूक लढवत असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून व्यक्त.
BJP is the only party that fulfills everything in its manifesto : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना स्मरून पुण्याच्या(Pune) सर्वांगीण विकासाची शपथ आज भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी घेतली. निवडणुकीला सामोरे जाताना जनतेसमोर स्पष्ट जाहीरनामा मांडूनच भाजप निवडणूक लढवत असल्याचे मत भाजप(BJP) प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण(Ravindra Chavan) यांनी व्यक्त केले. चव्हाण म्हणाले की, भाजपने आतापर्यंत 14 जाहीरनामे सादर केले असून, जाहीरनाम्यात दिलेली प्रत्येक घोषणा पूर्णत्वास नेणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे.
समताभूमी येथे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून पुणे शहरातील भारतीय जनता पार्टीच्या महापालिका निवडणूक प्रचाराचा अधिकृत शुभारंभ शनिवारी करण्यात आला. या कार्यक्रमास भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार हेमंत रासने, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, माजी मंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच भाजपचे सर्व उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपच्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांचा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व उमेदवारांना पुण्याच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी काम करण्याची शपथ देण्यात आली.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी अखेर भारतीय संघाची घोषणा; संघात कोण आउट आणि कोण इन
कार्यक्रमात बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले, सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महिला शिक्षणाचा पाया रचला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज देशातील सर्वोच्च राष्ट्रपतीपदावर महिला विराजमान आहे. समाजाचा तीव्र विरोध असतानाही सावित्रीबाईंनी आपले कार्य अखंडपणे सुरू ठेवले आणि त्या कार्याला महात्मा ज्योतिबा फुले यांनी खंबीर साथ दिली. सावित्रीबाईंचे विचार स्मरणात ठेवून ते आपल्या आचरणात उतरवणे ही आजची गरज आहे. ते पुढे म्हणाले, पुरुषप्रधान संस्कृतीत आता आमूलाग्र बदल घडू लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांत महिलांसाठी सर्वाधिक योजना राबवण्यात आल्या आहेत. कुटुंब सक्षम करायचे असेल तर महिलांना सक्षम करणे आवश्यक आहे.
केवळ विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक – केंद्रीय मंत्री मोहोळ
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्याचा विकास वेगाने सुरू आहे आणि तो विकास निवडणुकीच्या निमित्ताने जनतेसमोर मांडणे आवश्यक आहे. पुणेकरांनी नेहमीच भाजपच्या पाठीशी भक्कमपणे साथ दिली असून, सत्तेत असताना करण्यात आलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे.
निवडणूक काळात विविध विषय समोर येतील, मात्र भाजपने केवळ विकासाच्या मुद्द्यावरच लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले. पुण्याचा वेगवान विकास साधण्यासाठी भाजप कटिबद्ध असून, आम्हाला केवळ सत्तेसाठी नव्हे तर विकास आणि संस्कार रुजवण्यासाठी निवडून यायचे आहे, हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवायचा असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले.
