मोठी बातमी! उद्धव ठाकरेंवर कारवाई करा; केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश
![मोठी बातमी! उद्धव ठाकरेंवर कारवाई करा; केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश मोठी बातमी! उद्धव ठाकरेंवर कारवाई करा; केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2024/05/Uddhav-Thackeray-2.jpg)
Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच उद्धव ठाकरे गटाला जोरदार (Uddhav Thackeray) दणका बसला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मतदान सुरू असताना पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या पत्रकार परिषदेमुळे मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने कारवाईचे आदेश दिले आहेत.
निवडणूक आयोगाने आधी पत्रकार परिषदेचे विश्लेषण करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या होत्या. त्यानंतर आयोगाने उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंची 20 मे रोजीची पत्रकार परिषद म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन आहे अशी तक्रार आशिष शेलार यांनी दाखल केली होती. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत खोटी आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये केली आहेत, असे शेलार यांनी या तक्रारीत म्हटले होते.
शेलार यांच्या या तक्रारीची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहीले होते. त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं होतं याची माहिती मागवली होती. यानंतर राज्य निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेची तपासणी केली आणि या पत्रकार परिषदेचा मसुदा इंग्रजीत भाषांतरीत करून केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केला होता. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.
निवडणूक आयोगाच्या या आदेशानंतर आता उद्धव ठाकरेंवर काय कारवाई होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीच्या काळात आचारसंहिता भंग झाल्यास फौजदारी कारवाई होण्याची शक्यता असते. तसेच प्रचारबंदीसारखी सुद्धा कारवाई केली जाऊ शकते. परंतु, आता प्रचार संपला आहे. उद्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. अशात उद्धव ठाकरेंवर काय कापवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
लोकसभेच्या रणसंग्रामात उद्धव ठाकरेचं ‘मॅन ऑफ द सिरीज’ ठरतील; परभणीच्या उमेदवारानं सांगून टाकलं