Rajendra Nagwade, Rahul jagtap in NCP: विधानसभा निवडणुकीत दोन नेते एकमेंकाविरुद्ध लढले. एकमेंकाविरुद्ध तुफान आरोप-प्रत्यारोप केलेत आणि ते नेते पुन्हा एकाच पक्षात एकत्र आले तर तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष. हल्ली राजकारणात काहीही घडू शकते. असं घडलंय अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यात. एकमेंकाचे राजकीय विरोधक माजी आमदार राहुल जगताप (Rahul jagtap), राजेंद्र नागवडे (Rajendra Nagwade) यांनी अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केलाय. त्यामुळे अजितदादांची (Ajit Pawar) श्रीगोंद्यात ताकद वाढलीय. दोन स्थानिक नेते पक्षात आल्याने श्रीगोंद्याचे राजकारणात काय परिणाम होईल. झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुतेंना जड जाईल की महायुतीमध्ये तंटे सुरू होईल हे जाणून घेऊया…
रणजितसिंह मोहिते पाटलांचं करायचं काय? भाजपाचे कोडे सुटेना !
विधानसभा निवडणुकीत पाचपुतेंनी बाजी मारली
श्रीगोंदा मतदारसंघात विधानसभेला तिरंगी लढत झाली. त्यात भाजपचे नवखे उमेदवार विक्रमसिंह पाचपुते हे 37 हजार मतांची आघाडी घेत विजयी झाले. उबाठाच्या उमेदवार अनुराधा नागवडे, माजी आमदार राहुल जगताप यांना धूळ चारली. शरद पवार गटाचे जगताप हे अपक्ष रिंगणात उतरले होते. परंतु पाचपुतेंचा गड हलवू शकले नाहीत. निवडणुकीनंतर काही दिवस राजेंद्र नागवडे, राहुल जगताप हे शांत बसले होते. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच नागवडे व पाचपुते यांचा पक्ष प्रवेश झाल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढलीय.
धनंजय मुंडे यांनी योग्य पर्याय निवडला आता…, ‘त्या’ प्रकरणात पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
दोघांचे कारखाने, शिक्षण संस्था
राजेंद्र नागवडे यांचा सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना व शिक्षणसंस्था आहे. तर राहुल जगताप यांचाही कर्मयोगी कुंडलिकराव नागवडे हा साखर कारखाना आहे. दोघांचे कारखाने ऊस गाळप जास्त करतात. सरकारबरोबर असल्यास कारखान्यांना आर्थिक मदतही मिळते. त्यामुळे हे दोघे अजितदादांबरोबर गेल्याचे बोलले जात आहे.
अजितदादांकडे स्थानिक नेत्यांची फळी पण
श्रीगोंदा तालुक्यात अजितदादांकडे स्थानिक नेत्यांची फळीच तयार झालीय. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व वंचितकडून विधानसभा लढणारे अण्णासाहेब शेलार, दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नाहाटा, घनश्याम शेलार यांच्याबरोबर आता नागवडे व जगताप हे ही पक्षात आलेत. श्रीगोंद्यात अजितदादांकडे दहा-दहा किलोमीटरवर एक नेता झालाय. पण राहुल जगताप, राजेंद्र नागवडे यांच्या प्रवेशाने इतर नेत्यांचे महत्त्व कमी होणार आहे. अजितदादांनी जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकीचा विचार करून हे नेते एकत्र केले आहेत. त्यात ठाकरे गटाकडे उपनेते साजन पाचपुते हे एकमेव स्थानिक नेता आहे. तर शरद पवार गटाकडे ताकदच राहिलेली नाही. काँग्रेस गलितमात्रही आहे.
त्यामुळे झेडपी, पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुतीमध्येच घमासान होऊ शकते. म्हणजेच नागवडे-जगतापविरुद्ध पाचपुते असा सामना होऊ शकतो. परंतु त्यासाठी नागवडे व जगताप यांची समझोता एक्स्प्रेस गाडी सुसाट धावली पाहिजे. तरच ते पाचपुतेंना घेरू शकतात. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचे वडिल व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी नागवडे व जगतापांचे अनेक चक्रव्यूह भेदले आहेत. त्यामुळे ते मुलाला जगताप-नागवडेंचा डाव उधळायचा कानमंत्र नक्कीच देतील.